धारावीतील तरुणांना लग्न जोडीदार शोधण्यात अडचणी येत आहेत. सामाजिक कलंक आणि धारावीची वाईट प्रतिमा यामुळे गावातील किंवा शहरातील मुली लग्न करण्यास नकार देतात. स्वच्छता आणि मूलभूत सुविधांचा अभाव हे देखील प्रमुख कारण आहे. शिक्षित आणि नोकरी करणाऱ्या तरुणींच्या अपेक्षा वाढल्या आहेत, ज्या धारावीतील परिस्थितीशी जुळत नाहीत. पुनर्विकासाची आशा धारावीकर तरुणांना आहे.
लग्न… प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील अतिशय महत्वाचा टप्पा असतो. आयुष्याची सेकंड इनिंग यातून सुरू असते. नवं आयुष्य, जोडीदारासोबत रंगवलेली असंख्य नवी स्वप्न यात तरूण-तरूणी दंग असतात. मात्र आजकाल लग्न करतानाही भावी वधू-वरांची चिकित्सक वृत्ती खूप वाढली असून त्यांचे प्रेफरन्सेसही खूप बदलले आहेत. मुंबई हे सर्वांसाठी स्वप्नांचं शहर आह, या मुंबईत येण्यासाठी अनेक जण खूप मेहनत करतात. मात्र याच मुंबईतील काही वधू-वर सूचक मंडळांकडून (मॅरेज ब्युरो) धक्कादायक माहिती समोर आली आहे. ती आशियातील सगळ्यात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धारावीतील तरूणांबद्दलची आहे. या तरूणांपुढे एकं मोठं, नवं संकट उभं राहिलं आहे.
स्थानिक पातळीवर वधू-वर सूचक मंडळाचे काम करणाऱ्या डी सेल्विन नाडर यांच्या सांगण्यानुसार, अनेक चित्रपट आणि सोशल मीडियातून धारावीची काळी बाजू मोठ्या प्रमाणात दाखवली जाते. त्यामुळे इथले सगळे तरुण ‘बिघडलेले’ असल्याचा समज लोकांमध्ये पसरला आहे. “आजच्या तरुणींच्या मनात त्यांच्या भावी नवऱ्याची प्रतिमा तयार असते. नवरा मुलगा सुशिक्षित, सुसंस्कृत, मृदु भाषिक आणि समाजात प्रतिष्ठा असणारा असावा, अशी मुलींची अपेक्षा असते. असा सर्वगुणसंपन्न वर धारावीत सापडणारच नाही, असा समज (अथवा गैरसमज म्हणुया) तरुणींनी करून घेतला आहे. त्यामुळे बोहल्यावर चढायला उत्सुक असलेल्या धारावीतील तरुणांचे लग्नाचे स्वप्न लांबणीवर पडत आहे” असे जळजळीत वास्तव डी सेल्विन यांनी समोर मांडले.
आश्वासक भविष्य दिसत नसल्याने धारवीकर तरूणांना नकार
आप्लया भावी आयुष्यासाठी अनेक स्वप्न रंगवलेल्या या तरूणी, ‘उचित वर’ शोधताना आता शिक्षण, करिअर आणि प्रतिष्ठित आयुष्य या बाबींना प्राधान्य देतात. “जॉब करणाऱ्या सुशिक्षित तरुणी आपल्या तोलामोलाचा वर शोधतात आणि त्यांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होऊ शकतील, अशा ठिकाणी लग्न करतात. धारावीतील बहुतांशी घरांमध्ये स्वतंत्र शौचालय नसून अस्वच्छ सार्वजनिक शौचालयांची अवस्थाही फारच बिकट आहे, हे सर्वश्रुत आहे. अशा दयनीय परिस्थितीत तरुणींना आश्वासक भविष्य दिसत नाही” अशी प्रतिक्रिया बालाजी मॅट्रिमोनीचे संस्थापक पनीर सेल्वम नाडर यांनी दिली. “कोणतेही आई -वडील आपल्या मुलीचं लग्न अस्वच्छ आणि घाणीचं साम्राज्य असलेल्या ठिकाणी का लावून देतील?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
महिलेने मांडली व्यथा
धारावीत राहणाऱ्या एका महिलेने, त्यांच्या भावाची व्यथा मांडली. माझ्या भावाला चांगली नोकरी असूनही सातत्याने लग्नासाठी नकार पचवावा लागतो, असं त्यांनी सांगितलं. अद्यापही भावासाठी वधू शोधण्यात कुटुंबाला यश आले नसल्याची कबुली त्यांनी दिली. “लग्न करताना मुलींच्या माफक अपेक्षा असतात, त्या म्हणजे सुरक्षित घर आणि आसपासचे चांगले वातावरण. मात्र, दुर्दैवाने धारावीत या माफक अपेक्षा देखील पूर्ण होताना दिसत नाहीत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धारावीतील तरुणांवर ‘ टपोरी ‘ आणि ‘व्यसनी’ म्हणून बसलेला शिक्का. खरंतर धारावीतील सगळेच तरुण काही वाईट नाहीत. मात्र, धारावी बाहेरच्या जगाने इथल्या तरुणांविषयी जे चुकीचं चित्र उभं केलं आहे, ते सहजासहजी बदलता येणार नाही. यामुळेच धारावीतल्या तरूणांचे ‘वधू संशोधन’ जिकिरीचे झाले आहे” अशा शब्दांत त्या महिलेने आजच्या तरुणांची कैफियत मांडली.
“आधीच्या पिढीतील लोक इतका विचार करत नव्हते. पण आता तरुणींचा विचार बदलला आहे. होणाऱ्या नवऱ्याची मिळकत कमी असली तरीही चालेल, मात्र होणारं सासर हे स्वच्छ आणि प्रतिष्ठित ठिकाणी असावं, अशी अपेक्षा आजच्या तरुणींची आहे. चांगला वर हवा, मात्र लग्नानंतरचे आयुष्य झोपडपट्टीत व्यतीत करायला नको, अशी तरुणींची भूमिका आहे” असे सेल्विन यांनी सांगितले.
“धारावीतील वास्तव आणि तरुणींची अपेक्षा यातील तफावतीमुळे इथे वधू-वर सूचक मंडळ चालविणे देखील जिकिरीचे आहे. या व्यवसायातील बऱ्याच जणांनी आता आपला मोर्चा दुसऱ्या व्यवसायांकडे वळवला आहे” अशी खंत नाडर यांनी बोलून दाखवली. “कदाचित पुनर्विकासानंतर धारावीतील हे चित्र बदलेल. इथल्या घरांमध्ये देखील उच्चशिक्षित वधू संसार थाटतील. ” अशी आशा नाडर यांनी व्यक्त केली.
0 Comments