जादूटोण्याच्या संशयावरुन एका कुटुंबाला ग्रामस्थांनी जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळ जिल्ह्यातील तरोडा गावात जादूटोण्याच्या संशयावरुन एका कुटुंबावर हल्ला करण्यात आला. त्यानंतर या कुटुंबाचे घर जाळण्यात आले. या घटनेत चौघे जण जखमी झाले आहेत. त्यापैकी एकजण गंभीर जखमी झाला आहे तर तिघे जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींवर नागपुरातील सीटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ग्रामस्थांनी केलेल्या हल्ल्यात विनायक भोरे हे गंभीर जखमी झाले असून त्यांची मृत्यूशी झुंज सुरू आहे. तर त्यांचे संपूर्ण घर आगीत जळून खाक झाले आहे. गावातीलच काही जणांनी मिळून भोरे यांच्यावर हल्ला करुन घर जाळले. भोरे कुटुंबीय जादूटोणा करत असल्याचा ग्रामस्थांना संशय होता आणि त्या संशयातूनच त्यांनी हे कृत्य केलं आहे.
भोरे कुटुंबाचे घर पूर्णत: जळून खाक झाल्याने त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आता पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान या घटनेने तरोडा गावातच नाही तर संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
13 फेब्रुवारी रोजी यवतमाळ शहरालगत असणाऱ्या वाघाडी याठिकाणी माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली होती. येथील तीन जणांनी एका मोलमजुरी करणाऱ्या वयोवृद्धाची चाकुने सपासप वार करत निर्घृण हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी दोन अल्पवयीन आरोपींसह अन्य एकाला अटक केली. संबंधित तिन्ही आरोपींची कसून चौकशी केली जात आहे.
लक्ष्मण मसू जाधव असं हत्या झालेल्या वयोवृद्धाचं नाव आहे. ते यवतमाळ शहरालगत असणाऱ्या वाघाडी गावातील रहिवासी होते. ते गावात मिळेल ते काम करत आपला उदरनिर्वाह चालवत होते. पण त्यांनी शेजारी राहणाऱ्या शेळके कुटुंबीयांवर जादूटोणा केल्याचा संशय त्यांच्यावर होता. तसेच काही दिवसांपूर्वी याच परिसरात दोन जणांचा मृत्यू झाला होता. या दोघांच्या मृत्यूमागे मृत लक्ष्मण जाधव यांचा हात असावा. तसेच त्यांनी जादूटोणा केल्यानेच दोघांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता
0 Comments