जळगाव कारागृहाच्या सुरक्षा यंत्रणेबाबत कायम प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात असताना कैदी पळाल्यामुळे जळगाव कारागृहातील गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे
जळगाव, 25 जुलै: जळगाव जिल्हा कारागृहात कैद्यांमध्ये होणाऱ्या हाणामारी, कैद्यांना भेटणाऱ्यांवर होणारे हल्ले, तसेच कैदी पळून जाणं, अशा घटना आता नित्याच्याच झाल्या आहेत. त्यात शनिवारी सकाळी साडेसात वाजता तीन कैद्यांनी थेट सुरक्षा रक्षकांना शस्त्राचा धाक दाखवून कारागृहातून पलायन केल्याची घटना घडली. धक्कादायक म्हणजे, तिन्ही गुन्हेगारांना घेण्यासाठी चक्क एक दुचाकीस्वार कारागृहाबाहेर आला होता. त्यामुळे या घटनेमुळे पोलिस प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली.
जळगाव कारागृहाच्या सुरक्षा यंत्रणेबाबत कायम प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात असताना कैदी पळाल्यामुळे जळगाव कारागृहातील गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. प्रवेश द्वारावर असलेल्या सुरक्षा रक्षकांना शस्त्राचा धाक दाखवत आणि त्यांच्याशी झटापटकरून तीन आरोपींची चक्क मुख्य प्रवेश द्वारातूनच पलायन केल्याची घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेत कारागृहातील सुरक्षा यंत्रणेचे पूर्णपणे वाभाडे निघाल्याचे पाहायला मिळत आहे. एवढा कडेकोट बंदोबस्त असताना अशा प्रकारची घटना कशी घडू शकते, याबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. सुरक्षा यंत्रणेतील सुरक्षा कर्मचाऱ्यांचा या घटनेत सहभाग आहे का, अशाही चर्चा या निमित्ताने समोर आली आहे.
या घटनेत पलायन केलेल्या आरोपींमध्ये एक खुनातील तर दोन जण दरोड्यातील असल्याचे सांगण्यात येत आहे. पुणे येथील सराफ व्यापाऱ्याच्या पेढीवर सशस्त्र दरोडा प्रकरणातील मुख्य आरोपी सुशील मगरे हा पोलीस दलातील बडतर्फ कर्मचारी असल्याची माहिती समोर येत आहे. पलायन केलेल्या आरोपीमध्ये सुशील मगरे, गौरव पाटील आणि सागर पाटील हे तीन आरोपी आहेत. या घटने नंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कारागृहाला भेट देत त्या ठिकाणच्या सुरक्षा यंत्रणेचा आढावा घेऊन पलायन केलेल्या आरोपींचा शोध घेण्यास विविध पथके रवाना केली आहेत.
काय म्हणाले पालकमंत्री?
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही करगृहास भेट देऊन परिस्तिथीचा आढावा घेतला. जेलच्या तटबंदीची उंची वाढवण्याबाबत आपण सूचना दिल्या असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. जेल प्रशासन कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या, तसेच 200 बंदीची क्षमता असतांना 400 बंदी या कारागृहत असल्याने आपण गावाबाहेर दुसऱ्या जागी मोठ्या जेलची निर्मिती करण्याच्या दृष्टीने चाचपणी करण्याबाबत सूचना पोलीस अधीक्षक तसेच कारागृह प्रशासनास दिल्या असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.

0 Comments