मुंबईला जाणाऱ्या पंचवटी एक्स्प्रेसचे कपलिंग तुटल्याने गाडीला विलंब
कसारा रेल्वेस्थानक जवळच असल्याने कर्मचाऱ्यांनी येऊन युद्धपातळीवर कपलिंग जोडले. त्यामुळे ‘पंचवटी’ सव्वानऊला मुंबईला रवाना झाली. सकाळी सातला नाशिक रोड स्थानकात ती आली. चाकरमाने, व्यावसायिक यांनी गाडीत प्रवेश केला. गाडी इगतपुरीनंतर कसारा घाट ओलांडून तळघाट परिसरात आली.
तेव्हा इंजिनपासून असलेला डबा सी-२ आणि डबा डी-१ या दोघांमधील कपलिंग तुटले. इंजिन व अन्य डबे पुढे निघून गेले. प्रवाशांनी उर्वरित गाडी मागे राहिल्याचे कळविल्यावर ‘पंचवटी’ थांबली. येथून हाकेच्या अंतरावर कसारा स्थानक आहे. तेथील कर्मचाऱ्यांनी तातडीने येऊन इंजिनसह पुढे गेलेल्या गाडीला मागे आणून बाकी डबे पुन्हा जोडले.
यामुळे ‘पंचवटी’ मुंबईत निर्धारित वेळेपेक्षा ४० मिनिटे उशिरा मुंबईत पोहोचली. पंचवटी मध्य रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब केदारे यांनी सांगितले, की ‘पंचवटी’बाबत या आधीही असे घडले आहे. कल्याण स्थानकाजवळ दोन वर्षांपूर्वी कपलिंग तुटले होते. त्या वेळी गाडीला वेग कमी असल्याने जीवित हानी झाली नाही
आज त्याची पुनरावृत्ती झाली. गाडी वेगात असती तर मोठी दुर्घटना घडली असती. यापूर्वी असे कपलिंग तुटत नसे. आता पंचवटी एक्स्प्रेस या गाडीस जालन्याला शेअर केले जाते. तेव्हापासून गाडीच्या समस्या सुरू झाल्या आहेत. कर्मचाऱ्यांना गाडीची देखभाल करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही.
मनमाड-मुंबई ही गाडी मुंबईला सकाळी पावणेअकराला आली, की लगेच ती गाडी दुपारी बाराला मुंबई-जालना म्हणून रवाना केली जाते. जालन्याहून ही गाडी दुपारी साडेचारला मुंबईला येते, तीच गाडी मुंबई-मनमाड पंचवटी सुपरफास्ट एक्स्प्रेस म्हणून सव्वासहाला नाशिककडे रवाना करतात. यामुळे या गाडीची देखभाल नीट होत नाही. पंचवटी सुपरफास्टला स्वतंत्र रेक द्यावा.
0 Comments