-->

Ads

कोल्हापूरकर जनतेची आणि तुमची नाळ तुटली आहे का? सीमावासियांनी संभाजीराजेंना थेट विचारलं

 

बेळगावातील राजहंसगडावरील कार्यक्रमाच्या उपस्थितीवरून संभाजीराजें विरोधात रोष व्यक्त करण्यात आला आहे.





    कोल्हापूर, 6 मार्च : बेळगावातील राजहंसगड येथील पुतळा अनावरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आमदार धीरज देशमुख, माजी मंत्री सतेज पाटील आणि संभाजीराजे छत्रपती उपस्थित होते. दरम्यान, संभाजीराजे छत्रपतींना सीमावासीयांनी सणसणीत चपराक देणारे पत्र लिहिले आहे. बेळगावातील राजहंसगडावरील कार्यक्रमाच्या उपस्थितीवरून संभाजीराजें विरोधात रोष व्यक्त करण्यात आला आहे. सीमावासीयांच्या पाठीत खंजीर खुपसू नका, सीमालढ्यातील मराठी माणसाचा घात करू नका, असा उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे.

    कर्नाटकात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची वारंवार विटंबना होत असताना या कार्यक्रमाला येऊ नये, अशी सीमावासीयांची अपेक्षा होती. धीरज देशमुख जय कर्नाटक म्हणाले, त्याचे तुम्ही साक्षीदार होऊन आदरास अपात्र ठरल्याचा उल्लेखही या पत्रात करण्यात आला आहे. कोल्हापूरची जनता सीमावासीयांच्या नेहमी पाठीशी असते. मग तुमची कोल्हापूरशी नाळ तुटली आहे का, असाही उल्लेखही या पत्रात करण्यात आला आहे.

    कोल्हापूर

    महोदय,

    आपण रविवार दिनांक 5 मार्च 2023 रोजी किल्ले राजहंसगड बेळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांच्या अनावरण कार्यक्रमास हजर झाला त्याबद्दल सीमा वासियांच्या भावना इथे व्यक्त करीत आहे. मराठी भाषेसाठी गेली 66 वर्ष मराठी माणूस निरंतर लाट्याकाट्या झेलत संघर्ष करत आला आहे, अनेक लोकांनी जीवाचे बलिदान देऊन हा संघर्ष तेवत ठेवला. राजहंस गडावर शिवमुर्तीची जी प्रतिष्ठापना करण्यात आली त्या पाठीमागे व त्याच्या लोकार्पण सोहळ्याच्या पाठीमागे राजकीय पार्श्वभूमी होती. त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीने आपणास या कार्यक्रमास हजर न होण्याची विनंती केली होती.

    कर्नाटक राज्यात अनेक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना करण्यात आली. त्या विरोधात मराठी माणसाने वेळोवेळी संघर्ष केला, प्रसंगी कारावासही भोगला. त्या संघर्षाचा संदर्भ देत आपणास त्या कार्यक्रमास हजर न होण्याची विनंती करण्यात आली होती. आम्ही आजवर छत्रपतींच्या गादीचे वारस म्हणून तुम्ही आमच्या सोबत आहात, असे मानत होतो. परंतु आमच्या ह्या समाजाला तुम्ही हरताळ फासला आहे. तुमच्या उपस्थितीतच महाराष्ट्रातील आमदार देशमुख यांनी जय कर्नाटक असे उद्गार काढले. आपण छत्रपतींचे वारस म्हणवता तर मराठी विरोधी या घटनेचे आपण साक्षीदार होऊन सीमा वासियांच्या आदरास अपात्र ठरत आहात.

    मराठी माणसाच्या लढ्याला तुम्हाला बळ देता येत नसेल तरी तुमच्याकडे आमचा आग्रह नाही ,पण ज्या छत्रपतींचे नाव घेऊन सीमाभागात मराठी माणूस लढतो त्याच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम आपण करू नये ही विनंती. बेळगावातील मराठी माणसाचा लढा हा छत्रपतींच्या रयतेचा आहे., आपण त्यांचे पाईक मानले जाता तरी कृपया मराठी माणसाचा आपण घात करू नये, अशी सीमा भागातील जनतेची इच्छा आहे. कोल्हापूरकर जनतेने नेहमीच बेळगावकर जनतेची पाठराखण केली, आपण आपली भूमिका कोल्हापूरच्या जनतेसारखी ठेवाल, अशी अपेक्षा. नाहीतर कोल्हापूरकर जनतेची आणि तुमची नाळ तुटली आहे काय? अशी शंका येण्यास वाव मिळतो. छत्रपतीच्या विचाराचे आम्ही वारस आहोत त्यांच्या नावाने आम्ही लढा देत आहोत, आम्ही नक्कीच विजयी होणार आहे, तुम्ही आमच्या सोबत यावे ही श्री चरणी प्रार्थना. कळावे.

    आपला

    प्रकाश आप्पाजी मरगाळे

    महाराष्ट्र एकीकरण समिती बेळगाव

    Post a Comment

    0 Comments