-->

Ads

ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे प्रवासातील सवलत पुन्हा द्या खासदार श्रीकांत शिंदे यांची लोकसभेत आग्रही मागणी



उस्मान शाह अंबरनाथ प्रतीनीधी 
देशात ज्येष्ठ नागरिक, खेळाडू आणि विद्यार्थ्यांसह अनेक समूहांना भारतीय रेल्वे प्रशासनाकडून दिली जाणारी प्रवासी भाड्यातील सवलत २०२० वर्षात करोना काळापासून बंद करण्यात आली आहे. त्यामुळे अनेकांना पूर्ण भाडे द्यावे लागत असून यात निवृत्त झालेल्या आणि वेतन नसलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा आकडा अधिक आहे. त्यांना तात्काळ दिलासा देण्याची गरज आहे, अशी आग्रही मागणी कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सोमवारी शून्य प्रहरात केली. 

         याबाबत संसदेच्या सभागृहात बोलताना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी एका माहिती अधिकाराचा दाखला दिला. गेल्या दोन वर्षांत तब्बल चार कोटी ज्येष्ठ नागरिकांनी पूर्ण भाडे रेल्वे प्रवासासाठी दिले आहेत. ही सर्व संख्या निवृत्त आणि कोणतेही उत्पन्न नसलेल्या नागरिकांची आहे. सध्या फक्त १५ गटातील प्रवाशांना सवलत दिली जाते आहे. मात्र ही सवलत सर्व ५३ गटांना ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिक, खेळाडू, विद्यार्थी, पत्रकार  अशा विविध घटकांचा समावेश आहे, त्यांना पूर्वीप्रमाणे देण्याची गरज आहे. देशात २०११ च्या जनगणानेनुसार ज्येष्ठ नागरिकांची संख्या ११ कोटी असून येत्या २०२६ पर्यंत ही संख्या १७ कोटी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना तात्काळ दिलासा देण्यासाठी रेल्वे प्रवासात यापूर्वी दिली जाणारी प्रवासी भाड्यातील सवलत पुन्हा देण्याची आग्रही मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली.

Post a Comment

0 Comments