शाळकरी मुलांचे अपहरण करण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र, अपहरणाचा हा प्रयत्न गावातील दोन महिलांनी हाणून पाडला. ही घटना जळगावच्या पाचोरा तालुक्यातील राणीचे बांबरुड (Raniche Bambrud) या गावात घडली.
देवाचा भंडारा आहे, असे सांगत दोन जण राणीचे बांबरुड या गावात गहू आणि तांदूळ गोळा करत होते. याचदरम्यान ते जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात पोहोचले. शाळा सुटल्याची ही वेळ होती. शाळा सुटल्यामुळे मुले घराकडे निघाले होते. यावेळी या दोन भामट्यांनी तिसरी आणि चौथीच्या विद्यार्थ्यीनींना बिस्किटाचे आमिष दाखविले. इतकेच नव्हे तर दुचाकीवरुन आम्ही तुम्हाला घरी सोडून देतो, असे सांगितले. त्यानंतर त्या दोघांनी त्या तीन मुलींना सोबत दुचाकीवर बसवून अपहरण करण्याचा प्रयत्न केला.
याचवेळी भंडाऱ्यासाठी गहू, तांदूळ गोळा करणारे मुलींना घेऊन कुठे जात आहेत, अशी शंका दोन महिलांना आली. यानंतर या महिलांनी ही दुचाकी अडवली तसेच मोठ्याने आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला. अपहरण करण्याचा हा डाव त्या दोघांनाही लक्षात आल्यावर त्यांनी मुलींना दुचाकीवरुन खाली ढकलले आणि घटनास्थळावरुन पोबारा केला.
राणीचे बांबरुड या गावात ही घटना घडल्यानंतर त्या महिलांनी गावाच्या सरपंच यांना घडलेला हा सर्व प्रकार सांगितला. यानंतर याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात (Pachora Police Station) तक्रार देण्यात आली आहे. अपहरणाचा प्रयत्न करणारे दोन जण नेमके कोण आहेत, कुठले आहेत, तसेच त्यांच्यासोबत अजून कोणकोण आहेत, हे दोनच आहेत की त्यांची टोळी आहे, या संदर्भातील सर्व तपास पोलीस करत आहेत.

0 Comments