-->

Ads

हृदयद्रावक! आई जीव देत होती अन् लेकरं पाहात राहिली; चिमुकल्यांना काठावर ठेवून महिलेची विहिरीत उडी

 

Suicide in Aurangabad: औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात एका महिलेनं विहिरीत उडी घेत आत्महत्या (Married woman commits suicide by jump into well) केल्याची घटना उघडकीस आली आहे.



पाचोड, 14 फेब्रुवारी: औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील पैठण (Paithan) तालुक्यात एका महिलेनं विहिरीत उडी घेत आत्महत्या (Married woman commits suicide by jump into well) केल्याची घटना उघडकीस आली आहे. संबंधित महिलेनं आपल्या सहा महिन्यांच्या चिमुकलीला आणि चार वर्षाच्या मुलाला विहिरीच्या काठावर ठेऊन टोकाचं पाऊल उचललं आहे. गावातील काही लोकांना विहिरीशेजारी ही मुलं आढळल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

सीमा विष्णू नांगरे असं आत्महत्या करणाऱ्या 25 वर्षीय विवाहित महिलेचं नाव आहे. त्या पैठण तालुक्यातील पाचोड खुर्द येथील रहिवासी आहेत. त्यांना एकूण तीन मुलं आहेत. तीन मुलांच्या आईनं अशाप्रकारे आपल्या जीवनाचा शेवट केल्याने गावात खळबळ उडाली असून अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. त्यांची सर्वात लहान मुलगी अवघ्या सहा महिन्यांची आहे. त्यामुळे त्या बाळाचं आता कसं होणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मृत सीमा या घटनेच्या दिवशी रविवारी सकाळी अकराच्या आपली सहा महिन्यांची मुलगी आणि चार वर्षांच्या मुलाला घेऊन शेतात गेल्या होत्या. यावेळी दुपारच्या सुमारास शेतातील विहिरीत उडी घेऊन त्यांनी आपलं जीवन संपवलं आहे. यावेळी त्यांनी आपली दोन्ही लेकरं विहिरीच्या काठावर बसवली होती.

रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास गावातील काही लोकं बाळू नांगरे यांच्या शेतीच्या दिशेनं आली होती. यावेळी त्यांना ही दोन मुलं विहिरीच्या काठावर बसलेली दिसली. त्यानंतर घडलेला प्रकार गावकऱ्यांच्या लक्षात आला आणि त्यांनी विहिरीत उतरून सीमा यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. त्यांनी नेमक्या कोणत्या कारणातून हे टोकाचं पाऊल उचललं आहे, हे अद्याप कळू शकलं नाही. आत्महत्येच्या नेमक्या कारणाचा शोध घेतला जात आहे.




Post a Comment

0 Comments